Tuesday, September 14, 2021

"गावगाड्यातले माईलस्टोन"

आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की 'गावगाड्यातले माईलस्टोन' हे आपलं पुस्तक प्रकाशित झालय. शेता- मातीत राबणाऱ्या गावगाड्यातल्या आपल्या माणसा सारखंच ते साधं-सुधं असेल. पण यातली माणसं तुम्हाला नक्की आवडतील. नव्हे ती तुम्हाला झोपू देणार नाहीत. मग तुम्ही कितीही क्रूर असा, काळजावर दगड ठेवणारे असा, कारण गेली कित्येक वर्षे ही माणसं मलाच स्वस्थ झोपू देत नव्हती, मी जर ही माणसं पुस्तकात रेखाटली नसती तर ती भूत होऊन माझ्या मागे लागली असती. या माणसांची सुख-दुःखे तुमच्या डोक्यात शिरून त्यातील मेंदूला विचार करायला भाग पाडतील. या पुस्तकाला भलेही रेखाचित्रे नसतील, पण वाचताना ही माणसंच साक्षात तुमच्या डोळ्यांपुढं रेखाचित्रे बनून उभी राहतील.

या पुस्तकात तुम्हाला दिवस उगवायला साऱ्या गावाच्या म्हशींवर रेडा सोडणारी खमकी सोनाबाई भेटेल. गावच्या बायका रंडक्या करून त्यांना नासवून पुढच्या पिढ्याही बरबाद करणारा रंगेल राजारामबापू भेटेल. चुलीतल्या रताळागत भाजलेल्या शेवंतीला चादरीत गुंडाळून तालुक्याच्या दवाखान्यात बैलगाडी घेऊन सुसाट निघालेला नामा बापू भेटेल. आयुष्यभर तमाशाच्या कलेला वाहून घेऊन साऱ्या जन्माचाच तमाशा करून घेतलेला मातंग वस्तीतला जगन्या भेटेल. तसेच नवरा सोडून देऊन आयुष्याची राखरांगोळी करून घेतलेली रत्नप्रभाही भेटेल. कोयत्यानं कचा-कच इथल्या व्यवस्थेचंच पाय तोडणारी विधवा झालेली यल्लम्मा हातात कोयता घेऊन तुमच्या समोर येईल. एवढंच नाही तर डोक्यावर बांधलेल्या मंडवळ्या सुटायच्या आधीच मिलिट्रीतला नवरा मेल्यावर नुसत्या त्याच्या आठवणींवर म्हातारपणापर्यंत सत्तर वर्षे गर्भाशय जिवंत ठेवून गावगाड्यात नांदलेली हौसाआक्का तुमचं काळीज चिरत जाईल. एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल तेवीस माणसांच्या जीवघेण्या गोष्टी या एकाच पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळतील.

हे शेवटच्या जुन्या पिढीतले माईलस्टोन आपण जरूर वाचावेत. आपल्या मित्र मैत्रिणींनाही हे पुस्तक भेट देऊन आपल्या नव्या पिढ्याना या पुस्तकाच्या रूपाने शेता- मातीत गाडून घेतलेल्या माणसांची ओळख करून द्यावी. पुस्तक विकत घेऊन ते संपूर्ण वाचा. तुमच्या चांगल्या वाईट प्रतिक्रिया जरूर कळवा. आणि हो पुस्तक वाचल्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की या पुस्तकावर खर्च केलेले आपले पैसे फुकट गेले, तरीही आवश्य कळवा. आपण 1. Notionpress Store, 2. Amazon store, 3. Flipkart store या तिन्ही स्टोअरवरून पुस्तक ऑनलाईन खरेदी करू शकता. नोशनप्रेस स्टोअरवरून तुम्हाला कोरोनामुळे पुस्तक हातात येण्यासाठी दहा दिवसाचा कालावधी दिसेल पण प्रत्यक्षात चार-पाच दिवसात पुस्तक तुमच्या हातात येईल. व पॅकिंगची चांगली कॉलिटी येथे मिळेल.

संग्रहाची मूळ किंमत : रु. 200/- + 50 टपाल खर्चासहित आहे.

(जास्त प्रती मागविल्यास टपाल खर्च सवलत)

(तसेच Amazon, Flipkart मेंबरशिप असल्यास टपालखर्च फ्री असू शकतो)

1. Notionpress Store

https://notionpress.com/read/gaavgadyatle-milestone

2. Amazon store

https://www.amazon.in/.../ref=cm_sw_r_wa_apa_glt_fabc...

3. Flipkart store

https://dl.flipkart.com/s/_CNPSsNNNN

© ज्ञानदेव पोळ





Tuesday, January 8, 2019

एका कोयत्याची गोष्ट

परवा वर्धनगडाचा घाट उतरताना डावीकडं सहज नजर गेली आणि एका साखर कारखान्याची चिमणी आभाळात धूर ओकताना दिसली. अशा जुन्या डोंगरांच्या पायथ्याला महाराष्ट्रात आता कितीतरी चिमण्या दिवस रात्र ऊसाच्या चुया पिऊन धुराडी जाळत राहताना दिसतात. पण यावेळी त्या उंच आभाळातल्या ढगात काळ्याभोर धुरांची वर्तुळे मिसळत जाताना त्यात अचानकच एक मानवी चेहरा तयार होताना दिसला. काही क्षणात त्या चेहऱ्याला अंग फुटलं. हातात कोयता घेतलेला एक मानवी सांगाडा क्षणात नजरेला दिसू लागला. मला खुणावू लागला. हाका मारू लागला. हसू लागला. तो चेहरा होता मुर्गाप्पा मुकादमाचा. होय! मुर्गाप्पा मुकादम. पूर्ण कथा वाचा पुस्तक रुपात.....


Thursday, November 22, 2018

हौसा आक्का

दिवस उगवायच्या आधीच मारुतीला पाणी घालायला गेलेली पवाराची शांता गल्लीतनं ओरडतच आली, "हौसा म्हातारी कवा रातचीच अंथरुणात मरून पडलीया! बघा कि कसलं मराण म्हणायचं हि!" माझे कान गल्लीच्या दिशेने. शरीर अंथरुणात. डोळे नुसतेच सताड उघडे. क्षणात घड्याळ्याचे काटे जुन्या काळाकडे उलटे सरकू लागले. डोळ्यांच्या उघड्या स्क्रीनवर हौसा म्हातारीचा जीवनपट सुरू झाला. हौसा म्हातारी होतीच तशी. भले जिजाबाई सारखी ती आदर्श माता नसेलही. झाशीच्या राणीसारखी तलवार घेऊन रणांगणावर ती कधी लढली नसेलही. सावित्रीबाई सारखं संघर्ष करून तिनं शिक्षण घेतलं नसेलही. तरीही ती त्यांच्याइतकीच लढाऊ होती. जिद्दी होती. करारी होती. तिचं संपूर्ण नाही पण अर्धं संघर्षमय आयुष्य या डोळ्यांना पाहता आलं. क्षणात या साऱ्या गोष्टींच्या आठवणी बनून मेंदूच्या वाटेने खाली सरकत डोळ्याभोवती जमू लागल्या. हौसा म्हातारीच्या शेकडो आठवणी डोक्यात. लिहायला बसलो तर दिवस पुरणार नाही. पण सांगायलाच हवी तिची गोष्ट.

पूर्ण कथा वाचा पुस्तक रुपात.....


©ज्ञानदेव पोळ
प्रातिनिधिक फोटो 

Monday, October 29, 2018

भवितव्य नसलेल्या झुंडी

फाट्यावरून डाव्या बाजूनं गावाकडे वळसा घेतला कि माळावरच्या टेकडीवर दहा-पंधरा घरांची कुंभार वस्ती लागते. या वस्तीवरच्या चार पाच घरातली तरुण पोरं शिकून शहराकडे गेल्यानं त्यांची घरं आता सिमेंट काँक्रीटची बनलीत. बाकीची घरं तशीच जुन्या वळणाची. आत वावरणाऱ्या जुन्या माणसासारखीच. आपलं जुनं पण टिकवून धरलेली. या वस्तीत मध्यभागी मंगलोरी कौलांचं अर्ध कच्च एक पडकं घर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं. बदलाचा कुठलाच वारा अंगावर न पांघरलेल्या त्या घरात पारुबाईचा 'लुकडा शिवा' राहतो. पारुबाई त्याची आई. मोठी धीराची बाई. एकेकाळी नवऱ्याच्या माघारी लहान शिवाला सोबत घेऊन, कुंभाराच्या गरगर फिरणाऱ्या चाकावर मातीच्या भांड्याना ती कोरीव आकार देत बसलेली दिसायची. तिच्या घरापुढच्या मातीच्या चाका भोवती सदैव गाडग्या मडक्यांची रांग लागलेली असायची.

पूर्ण कथा वाचा पुस्तक रुपात.....


©ज्ञानदेव पोळ

Monday, October 1, 2018

एक्झिट घेतलेला बापू

हजार स्वप्नं डोक्यात भरून जगायला गेलेल्या बापूसाबाचा तरुण श्वास मुंबईतल्या एका इस्पितळात थांबल्याचं आताच कळालं आणि मी प्रचंड अस्वस्थ झालो. लहानपणी त्याच्यासोबत घालवलेल्या सगळ्या आठवणी वाऱ्याच्या वेगानं तळातून वर येऊन डोक्यातून लाह्या फुटाव्यात तशा फुटू लागल्या. तडतड करू लागल्या. बापूसाब गरिबीत जन्मला. गरिबीच्या पदराला धरूनच वाढला. हायस्कुलची शाळा तीन किलोमीटर लांब. दगड धोंड्याचा रस्ता. असला रस्ता बिना चप्पलांचा तुडवत बापूसाब शाळत यायचा. आतल्या चड्डीचा फटका भाग दिसू नये म्हणून एकावर एक चढवलेल्या दोन खाकी फाटक्या चड्ड्या, चुरगळलेला पांढरा शर्ट, डोक्याच्या बारीक केसांच्यावर चढवलेली पांढरी टोपी. एका ठिक्याच्या पोत्याची दप्तरासाठी शिवलेली पिशवी. आणि आभाळातनं ढासळणारं पावसाचं पाणी चुकवण्यासाठी पोत्याच्या बारदानाची अंगावर खोळ. गरिबीचा हा साज अंगावर चढवलेला बापूसाब माळाचा चिखल तुडवत सकाळी सगळ्यांच्या अगोदर शाळेच्या वाटला लागलेला दिसायचा.

लहानपणापासूनच बापूसाबाला वाचनाचं प्रचंड वेड. कुठून कुठून तो पुस्तकं मिळवायचा. देव जाणे पण मी आजपर्यंत जेवढी पुस्तकं वाचली नसतील तेवढी त्यानं शाळेच्या काळात वाचली असतील. बाबा कदमांचा तर तो निस्सीम भक्त होता. सुट्टीदिवशी आम्हाला गुरांमागे तो बाबा कदमांच्या कादंबऱ्या वाचायला आणायचा. बाबा कदम, बाबुराव अर्नाळकर, ना.सी.फडके, वि.स.खांडेकर यांच्या कादंबऱ्यातली प्रेमाची वर्णने वाचून अक्षरशः त्या वयात या बापूसाबानं आम्हाला वेड लावलं. आपल्या जगण्यात, वागण्यात, दिसण्यात नसलेली एक वेगळीच दुनिया या पुस्तकांनी रानामाळात समोर आणून दाखवली. ती या बापूसाबामुळंच. पुस्तकं वाचण्याचा खरा प्रवास येथून सुरु होतो. अर्नाळकरांच्या रहस्यकथा बापूसाब मोठ्या आवाजात गुरामागं वाचायचा. नंतर त्याला पोलीस टाईम्स वाचायचं एक प्रचंड वेड लागलं. म्हणायचा,"असलं वाचल्यानं आपल्याला शहाणं होता येतं. आपला घातपात करणारी माणसं चटकन ओळखता येतात. वेळीच सावध होता येतं! आणि उद्या पोलीस झाल्यावर आपल्याला तपास करायला पण सोपं जाईल" असं काही बाही त्याच्या जीवनाचं त्या काळातलं तत्वज्ञान.

मोठं होऊन पोलीस व्हायचं त्याचं स्वप्न होतं. त्याची तयारी तो शालेय जीवनापासून करत होता. गुरामागं त्याला अचानक हुक्की यायची. डोळ्यांत स्वप्नं उतरली कि भर दिवसा असा रानामाळात जोर बैठका मारायचा. पळायचा. लहानपणी पाहिलेली स्वप्नं हि लहानपणीच मरून जातात. कुठेतरी वाऱ्यासोबत ती विरून जातात. पण पुढं कॉलेजला गेलं तरी बापूसाबानं हे स्वन्न उराशी धरून ठेवलेलं. भरतीला लांब लांब जायचा. पण कशात तरी बाहेर निघायचा. पुन्हा तयारीला लागायचा. बापू कॉलेजात आला तरी गरिबीनं काही त्याची पाठ सोडली नाही. नाही म्हणायला आता त्याच्या पायांना चप्पला चिकटल्या होत्या. पण त्याही चामड्याच्या. पना तुटलेल्या चप्पला घालून मिरवायला बापूला कधी खंतही वाटली नाही आणि डांबरी सडकेवर कॉलेजच्या पोरीसमोर त्यातून करकर आवाज काढताना त्याची त्याला लाजही वाटली नाही. सत्यापासून पळवाटा शोधून जगणं त्याला पसंत नव्हतंच. एस.टि च्या पासाला पंचवीस रुपये मिळाले नाहीत म्हणून उलट्या वाऱ्यावर दिवस उगवायला सायकल मारत निघालेला बापू कित्येक महिने मी पाहिलाय.

मोठेपणी बापूसाब पोलीस बनला नाही. पण त्याची त्याला खंत वाटली नाही. अखेर जगण्याची स्वप्नं एका पिशवीत भरून तो मायानगरीत उतरला. कित्येक वर्षे परिस्थितीशी झुंज देत तो लढत राहिला. टकरा घेत राहिला. त्याला अखेर यशही मिळालं. पण गरिबीत काढलेल्या जुन्या दिवसांना तो कधी विसरला नाही. स्वतःला पोलीस होता आलं नाही पण त्याचा एक भाऊ फौजदार आणि शिक्षक बनला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर पसरलेला आनंद अवर्णनीय होता. मागच्या 10 मार्चला बापूसाब पुण्यात भेटला. तसाच साधा भोळा. बदलांचा कुठलाच वारा अंगावर न झेललेला चेहरा. सैदव हसतमुख. चहा पिता पिता सगळ्या जुन्या आठवणी चाललेल्या. आता वाचन करतोस का म्हंटल्यावर म्हणाला, आता पोरंबाळं संसार सारं काही मागं लागलंय. पहिल्यासारखा वेळ मिळत नाही. तरीपण वेळ असला की अजून वाचत बसतो. पण आता संसाराची चांगली घडी बसलीय.

त्या दिवशी बापूसाबाला पाठमोरा बघताना हि त्याची शेवटचीच भेट ठरेल अशी मी कल्पनाही करू शकलो नसतो. लहानपणी वादळवाऱ्याशी आणि मातीशी हजार टकरा घेणारा बापूसाब मायानगरीनं अंगावर चढवलेल्या कविळीसारख्या दुखण्याला कसा काय भिडू शकला नसेल? माहित नाही. शालेय जीवनात गुरामागं बाबुराव अर्नाळकरांच्या रहस्यकथा वाचणाऱ्या बापूसाबाला त्याच्या जीवनाचीच रहस्यकथा कशी काय समजली नसेल? माहित नाही. काही वर्षापूर्वी कपडयाची एक पिशवी भरून गेलेल्या बापूसाबाला संसार उभा करताना काय काय कष्ट पडले असतील? ते हि माहित नाही.

अखेर काही वेळात नियतीने पंख छाटलेल्या तुझ्या ओल्या देहातील स्वप्नांचा अखेरचा प्रवास तुझ्या बायका पोरासोबत गावच्या मातीच्या दिशेने सुरु होईल. जीवनाच्या रंगमंचावरून तू अशी अकाली घेतलेली एक्झिट डोळ्यांचा पडदा उघडला कि कित्येक वर्षे ती दिसत राहील. आठवतच राहील. तू केलेल्या संघर्षाला आणि जिद्दीला सलाम...

©ज्ञानदेव पोळ




गोष्ट एका कुहूची...

माझे फायदे सगळे करून घेतले त्यानं. आजही करून घेतोय. माझं ऑफिस म्हणजे प्रसिद्धीखातं. तिथं सरसकट माझं नाव वापरून कामं करून घ्यायची. पुन्हा तुमच्या खात्यातल्या लोकांना दारू पाजावी लागते म्हणून ऐकवायचं. कधीकधी इतका संताप होतो ना…खूप शिव्या घालाव्या वाटतात. माझी आजी द्यायची तशा इरसाल शिव्या. पण जमत नाही. वाटतं, की जर अडाणीच राहिले असते अन् नवर्‍यानं असं वागवलं असतं ना, तर सरळ फारकत घेऊन मोकळी झाली असते. सुखानं एकटी राहिले असते, नाहीतर दुसर्याशी पाट लावला असता. पण आता ? आता असं करून कसं चालेल ? मी शिकलेली आहे. सुसंस्कृत आहे. मध्यमवर्गीय नोकरदार बाई आहे. आज माझी प्रतिष्ठा निराळी आहे. मला असं काही कसं करता येईल ? शिकणं, सुसंस्कृत होणं; या गोष्टीचे परिणाम असे होणार असतील…आपण अधिक भेकड, अधिक भाकड होणार असू…तर खरंच पुनर्विचार केला पाहिजे ना अशा गोष्टींचा…

हा प्यारेग्राफ आहे एका प्रसिद्ध लेखिकेच्या ब्र या कादंबरीतील. एक महिला सरपंच आणि तिच्या आयुष्यवर भाष्य करणारा. जेव्हा जेव्हा हा वाचला जाईल तेव्हा तेव्हा तो चेहरा डोळ्यासमोर येईल. आणि तो चेहरा असेल ब्र, भिन्न, कुहू, रजईच्या लेखिका Kavita Mahajan ताई यांचा. ताईंची अशी अकाली एक्झिट? विश्वासच बसत नाही अजून. अजून वाटतं हे स्वप्न असावं. खोटं खोटं पडलेलं. सारं आयुष्य साहित्य क्षेत्राला वाहून घेतलेली ही लेखिका अशी कशी काय सोडून जाऊ शकते? त्या पुण्यात आल्यानंतर त्यांना भेटायचं मनोमन ठरवलं होतं.

काही दिवसांपूर्वीच त्या कर्वे नगरला वसईहुन नव्या घरी शिफ्ट झाल्या होत्या. जणू काळच त्यांना वैकुंट भूमीत घेऊन येत असेल याची कल्पनाहि त्यांना नसावी. या काळात झालेली दगदग, त्रास त्यांच्या तब्बेतीला सहन झाला नाही असेच म्हणावे लागेल. किरकोळ दुखण्याने त्या अशा अकाली जातील असे कोणालाही वाटले नाही. वसईहून निघताना त्यांना कोणीतरी म्हणालं होतं तिकडे आता परमनंटच जाणार का? तेव्हा त्या म्हणाल्या होत्या. काय असतं हे परमनंट जाणं? मला तर अख्ख्या पृथ्वीवरच उपरं उपरं वाटत आलंय. सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या ताई सप्टेंबर महिन्यातच गेल्या. त्यांचा जन्म आणि मृत्यू हा एकाच महिन्यात नियतीने का लिहिला असेल?

त्यांनी संपादित केलेल्या आदिवासी लोकगीतांना साहित्य अकादमी सुद्धा मिळाला. ग्राफिटी वॉल, ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम, ब्र हि कादंबरी रसिकांनी उचलून डोक्यावर घेतली. त्यांनी अनेक पुस्तकांच्या संपादना बरोबरच बकरीचं पिल्लू, जंगल गोष्टी इत्यादी बाल कथासंग्रह, लेखसंग्रह, मृगजळीचा मासा, धुळीचा आवाज इत्यादी कविता लेखन आणि जोयनाचे रंग, पूल नसलेली नदी इत्यादी कथासंग्रह लेखनही केलं. त्यांचा घुमक्कडी हा ब्लॉग विशेष वाचनीय ठरला. मराठी साहित्याला साता समुद्रापार पोहचवणाऱ्या या लढवय्या लेखिकीच्या अशा अकाली जाण्याने साहित्य क्षेत्राचं खूप मोठं नुकसान झालय. त्यांचे कित्येक संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर होते.

एबीपी माझाचा ब्लॉग माझा पुरस्कार मिळाला तेव्हा कविताताई परीक्षक म्हणून होत्या. त्यांनी लिखाणाबाबत अनेक सूचना केल्या होत्या. त्या सातत्याने लेखनात आणण्याचा मनोमन प्रयत्न चालू होता. या साऱ्यांच्या आता फक्त आठवणी झाल्यात.

त्यांच्यात भाषेत सांगायचं तर मुसळधार पावसाचे आवाज ऐकत मी शांत बसून आहे. मन अशावेळी रिकामं असावं आणि एकही अक्षर ऐकू येऊ नये असं वाटतं. दरड कोसळत राहावी कितीतरी वेळ आणि राडा व्हावा जे खाली सापडेल त्याचा. एक उबदार कुस हवी वाटतेय. माझ्या मऊ टेडीबीअरला जवळ घेऊन मी खिडकीबाहेरचा काळोख बघत बसतेय. प्रत्येक झाडावर वेगळा वाजतोय पाऊस, दगडावर-खडकावर वेगळा, घराच्या प्रत्येक छतावर वेगळा, समुद्राच्या अथांग पाण्यावर वेगळा आणि माझ्या पापण्यांवर वेगळा.

खरंय ताई सगळ्यांच्या पापण्यांवर असा वेगळा पाऊस पाडून तुम्ही निघून गेलात. दूरच्या प्रवासाला. कधीही न परतण्यासाठी. काही दिवसापूर्वीच तुम्ही म्हणाला होतात, "माणसं गेली की, उत्सुकतेने ढीगभर काव्यात्मक श्रद्धांजल्या वाहणारे आपण. हयात असलेल्या व्यक्तींसाठी आपल्याला वेळ असतो का?’ खरंय ताई.

शेवटी क्षणाचाही भरोसा नसलेल्या भयाण जगात वावरत असताना एका वळणावर आज नियतीने तुमचा श्वास थांबवला. मराठी साहित्यातील एक लढवय्या बंड शमलं. अखेर स्त्री साहित्याला नवी दिशा दाखवून स्वतःच्या दिशाला (लेकीला) तुम्ही घरात एकटी एकटी मागे ठेवून गेलात. नाहीतर कामवाल्या बाईला वसईहून निघताना तुम्ही म्हणाला होतातच. मी मेले की दिशाला पुस्तकांचा पसारा आवरायला किती त्रास होईल गं. तो त्रास इतक्या लवकर तुम्ही तिला द्याला असं स्वप्नातही वाटलं नव्हतं...

©ज्ञानदेव पोळ


नाना देसाई

सारी दुनिया पुढं गेली तरी नाना देसाई अजून जुन्या काळातच जगतोय. नानाला भेटलं कि कधी कधी वाटतं. एकेकाळी नांगरटीसाठी त्यानं आणलेला घरातील एक जुनाट दोरखंड बाहेर काढावा. तो नानाच्या कमरेला घट्ट बांधावा. आणि अलगद त्याला त्या जुन्या काळातून या नव्या जगात ओढून घ्यावा. पण नानाला असं अलगद ओढून नव्या जगाशी जोडणं तितकं सोपं नाही. का नाही ते पुढं सांगत जाईलच तुम्हाला. पहाट संपून गावावर तांबडं फुटावं. दिवस उगवावा. पाखरं घरट्यातून उंच आकाशी उडावी. गुरं ढोरं चरायच्या ओढीनं पांदिला लागावी. अजून कडाक्याची थंडी गावावर पसरलेली असावी. अशा अंगाला चावणाऱ्या थंडीत माणसं घरोघरी शेकोट्या करून बसलेली असावी. आणि दाट धुक्यातून वाट काढत अचाकन अंथरुणावर येऊन कुणीतरी आवाज द्यावा. " उठा कि वं उजाडलं आता! तेवढी कुळवट करून घेतली पाहिजेल! शाळवाचं रान पेरायला लागलं!" होय! हा आवाज देऊन सकाळी झोपेतून उठवायला आलेली आणि मळ्यात कुळवावर बसायला चला म्हणून सांगणारी व्यक्ती नाना देसाईंच असायची. 

पूर्ण कथा वाचा पुस्तक रुपात.....


©ज्ञानदेव पोळ



Tuesday, September 11, 2018

सोनाबाई

धनगर वाड्याच्या बोळातनं वळसा घालून थोडंसं पुढं गेलं की एका उंचवट्यावर एक पडकं घर दिसतं. घराचं निम्मंअर्ध आडं आता खाली निसटलय. भिंतींनी केव्हाच धर सोडलीय. भिंतीतल्या चार-दोन तुळ्या मात्र अजून तग धरून आहेत. एकेकाळी त्या तुळ्यावर लिहिलेली ठळक अक्षरे आता पुसून गेलीत. घराच्या पडक्या भिंतीवर पावसाळ्यात हिरव्यागार गवतांचे झुपकेच्या झुबके उगवलेले दिसतात. गार वारं सुटलं कि वाऱ्यासोबत तेही डुलू लागतात. त्यावर धनगर वाड्यातली शेरडं करडं कधी कधी उड्या मारत हिंडताना दिसतात. आत पडक्या भिंतीचा आडोसा धरून एक व्यालेली फिरस्ती कुत्री तिच्या चार पाच काळ्या पांढऱ्या पिलांना थानाला लावून डोळे मिठून सुस्त पडलेली दिसते. एकेकाळी हे घर धन धान्याने आणि सुबत्तेने भरलेले असायचे. त्या घरात राहणारी खमकी बाई आयुष्यभर टेचात जगली. 

पूर्ण कथा वाचा पुस्तक रुपात.....


©ज्ञानदेव पोळ


Thursday, August 16, 2018

रत्नप्रभा

रत्नप्रभा होतीच तशी. एका क्षणात कुणालाही आकर्षित करून घेईल. नुसतीच लग्न करून नांदायला आलेली. इतकी सुंदर बाई हणमंताला कशी काय मिळाली याची साऱ्या गावभर चर्चा रंगायची. लांबसडक नाक. पाणीदार डोळे, गोलाकार रेखीव चेहरा, चौकटीला टेकेल एवढी उंची आणि मागे पाठीवर सोडलेल्या लांबसडक केसांचा नाजूक भार. ती हसली म्हणजे प्राजक्ताची फुलं सांडल्याचा भास व्हायचा. इतकं देखणं रूप तिला लाभलेलं. जवानीत शिरलेली तरणीबांड पोरं गावाबाहेरच्या तिच्या घरापुढं दिवसभर घुटमळत राहायची. 

पूर्ण कथा वाचा पुस्तक रुपात.....


©ज्ञानदेव पोळ


Tuesday, July 24, 2018

चंदू नाईक


सारं गाव म्हणायचं त्याच्याएवढा धाडसी माणूस अजून पंचक्रोशीत जन्माला आला नाही. तो होताच तसा. अंगानं पिळदार यष्टीचा. डाव्या हातात पितळेचे एक कडं. गळ्यात काळ्या दोऱ्याला लोंबकळणारी कुठल्या तरी देवीची मळकटलेली मूर्ती. झुबकेदार मिशा. रंगाने म्हणाल तर काळाकुट्ट गडी. पण एका दमाला पाच सात भाकरी मुरगळायचा. होय! चंदू नाईक त्याचं नाव. गावाच्या बाहेर असलेल्या मातंगवाड्यात स्वातंत्र्याच्या आधी कधीतरी एका पावसाळ्यात तो जन्मला. तिथल्याच दाटीवाटीने दबलेल्या बोळात तो वाढला. 

पूर्ण कथा वाचा पुस्तक रुपात.....





Friday, June 15, 2018

गोदानानीची बकुळा

पावसाळा आला की सणगराच्या आळीतली गोदानानी आठवते. पदराला चिकटलेल्या चार पोरी आणि सोफ्यातल्या कुडाला बीडी ओढत बसलेला उघडा दारुडा नवरा घेऊन, गळक्या घरावर कोसळणारा अक्खा पाऊस गोदानानी दिवस रात्र घरात झेलायची. बकुळा, जाई, जुई आणि शेवंता अशा फुलासारख्या चार लहान पोरींचं पावसाळ्यात खाण्या पिण्याचं प्रचंड हाल व्हायचं. हाताला काम नसायचं आणि ओल आलेल्या चुलीच्या कोपऱ्यात जळणाचं काटूकसुद्धा नसायचं. दिवस रात्र पाऊस रपरप आणि सोफ्याच्या तुटक्या पत्र्यावर तडतड वाजत राहायचा. दारात पाण्याचा डोह साठायचा. त्यातून वाट शोधता यावी म्हणून पाण्यात दगडाच्या चीफा टाकलेल्या असायच्या. दगडावर पाय टाकायला चुकलाच तर खाली गुडघाभर पाण्यात पाय जायचा. घरा पुढचा उकिरंडा पाण्यात गडप व्हायचा. त्यात रात्रभर डराव डराव बेडकांचा आवाज चाले. रात्र झाली की तिच्या घराच्या उंबऱ्यावर एक सुतळी वातीचा दिवा लुकलुकताना हमखास दिसायचा. अन दिव्याच्या उजेडात आजूबाजूला तिच्या पोरी पाट्या दप्तरे घेऊन बसलेल्या दिसायच्या. बकुळी थोरली असल्यानं सगळ्यांना शिकवायची.

पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....

मास्तर

मास्तर आता कायमचे शहराकडे आलेत. पण सारी हयात वाड्या वस्त्यांवर तालुका मास्तर म्हणून घालवलेल्या मास्तरांचा जीव काही इकडे रमत नाही. वयाने आता थकलेत. "पण माज्या माघारी हातानं करून खाऊ नका! तुमचं सगळं आयुष्य उपासमारीतच गेलंय! आपल्या पोरांच्याकडं जाऊन रहावा!" असं अखेरचा श्वास घेताना मास्तरीनबाईनी सांगिल्यामुळे मास्तर शहरवाशी झालेत. मास्तरांची दोन्ही मुलं जवळ जवळच राहतात. थोरला ईस्टला तर धाकटा वेस्टला. पण रेल्वेलाईनवरचा तो लोखंडी ब्रिज ओलांडताना काळानुसार मास्तरांचे गुडघे आता भरून येतात. चढताना त्यांना धाप लागते. भर गर्दीत एखाद्या पायरीवर बसून राहतात. शहरात आल्यावर मास्तर धाकट्याकडे होते. नंतर नंतर त्या किचन मधली भांडी वाजल्यावर मास्तर आता सकाळचे थोरल्याकडे जेवतात. संध्याकाळी धाकट्याकडे. थोरला मुलगा मास्तरांशी जास्त बोलत नाही. पण त्याची बायको मास्तरांशी चांगलं वागते. धाकटा पोरगा चांगला आहे पण बायको नाही. तिला आल्या गेलेली घरी नको असतात. सतत धुसपुस करीत राहते. पण मास्तरांचा लेका सुनापेक्षा नातवंडातच जीव रमतो. आता तीच त्यांच्या जगण्याची आधार केंद्रे बनलीत...

पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....

#ज्ञानदेवपोळ

Sunday, April 15, 2018

कश्मीर की कली

आसिफा बद्दलच्या पोस्ट वाचल्यानंतर तिच्या विषयीचा पुढचा घटनाक्रम वाचणे माझ्या सहन शक्तीच्या पलीकडे गेलेले. काय हे भयानक चालूय आजूबाजूला या प्रचंड निराशेत रात्री बेडवर पडलेलो. अगदी तिच्याच सेम वयाची माझी मुलगी माझ्या जवळ आली. नेहमीप्रमाणे माझ्या बाजूला असलेला मोबाईल तिने हातात घेतला. बऱ्याच वेळा ती फेसबुकवरचे फोटो पहात राहते. जिथं जिथं लहान मुलांचे वाढदिवसाचे वगेरे फोटो दिसतात तेथे ती नेहमी लाईक करत राहते. खरे तर माझ्या फ्रेंड लिस्टमधील लहान मुलांच्या फोटोवरचे असे बरेच लाईक हे तिनेच केलेले असतात. ते चिंटू नावाचे पेज तिला प्रचंड आवडते. ते तिच्यासाठी मी फेवरेट लिस्टमध्ये ‘सी फर्स्ट’ केल्याने सतत तो चिंटू माझ्या वालवर फिरत राहतो.

पण रात्री तो चिंटू स्क्रोल करूनही तिला वालवर कुठेच दिसत नव्हता. अधे मध्ये ती गंभीरपणे काहीतरी वाचताना दिसत होती. मी काही बोलण्याआधीच तिने विचारले, “पप्पा हि मुलगी कोण आहे? मी हादरलोच. पुन्हा तेच डोळ्यासमोर. म्हंटलं, “का रे! असेल कोणतरी!” पप्पा सगळीकडे हिचेच फोटो दिसताहेत! हिला मारलय का कोणी? मी अडखळलो. शब्दच फुटेना. रक्ताळलेल्या एका फोटोवर लाईक करताना तिचा हात आज अडखळा होता. “सांगा ना पप्पा?” पुन्हा तिचा तोच प्रश्न. अखेर मी धाडस केलं. म्हणालो. “हो बाळा मारलय तिला!” पण का पप्पा? का मारलं तिला? तिला नेमके कसं समजून सांगावं या विचारात डोकं बधीर होऊन गेलेलं. आपण एखादी गोष्ट लहान मुलांपासून लपविण्याचा प्रयत्न केला कि त्यांची उत्कंठा जास्तच ताणली जाते. तिचं असच काहीसं झालेलं. अखेर मी आसिफावर रेप झाल्याचं सांगून टाकलं. पुन्हा तिचा तोच प्रश्न. “रेप म्हणजे काय हो पप्पा?” आसिफच्याच वयाची माझी मुलगी. मला विचारतेय. रेप म्हणजे काय असतं. आणि मी पालक असून तिच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देऊ शकत नाही. या साऱ्या गोष्ठी अजून समजून घेण्याचं या लहान मुलांचं वय नसताना आसिफा हकनाक कुस्करली गेली. अनेकांकडून... 

मी जागेवरून उठणार इतक्यात तिचा पुन्हा प्रश्न. “पप्पा तिला मारून या नालायक लोकांना काय मिळतं हो? ती कुठं राहते? मला तिची स्टोरी सांगा ना?” मी जागेवरून उठलो तिच्या जवळ गेलो. तिच्या नजरेला नजर दिली. म्हणालो, 
“बाळा! आसिफा शेळ्या मेंढ्या पाळणाऱ्या काश्मीरातल्या गरीब बकरवाल समाजात जन्माला आली. पण तिला इथल्या धर्म रक्षकांनी जातीधर्माच्या सुळावर उभी केली? तिचं अपहरण करून तिला तिला मंदिरात जनावरासारखी बांधून घातली. विकृत नराधमांनी तिचं गुप्तांग उध्वस्त करून टाकलं. इतकं सारं सोसूनही आसिफा जिवंत राहिली. लुळ पडत चाललेलं शरीर घेऊन झुंजत राहिली. वेदनांनी आणि उपाशी पोटाने गहिवरत राहिली. पण तिची दया येणार कोणाला? अखेर नराधमांनी डोक्यात दगड घालून तिला काश्मीरच्या दऱ्या खोऱ्यातून कायमची मुक्त केली”. मी हे सगळं सगळं तिला सांगितलं. पण.... ओठ मिठून... मनातल्या मनात.... नुसतच भरल्या डोळ्यांनी... 

आसिफाच्या प्रश्नातून मला मुक्ती घ्यायची होती. माझी सोडवणूक करायची होती. हा विषय थांबविण्यासाठी उठून मी बाहेर निघालो तर माझ्या मागे येत पुन्हा ती म्हणाली, “मग तुम्ही का लिहित नाही तिच्यावर आर्टिकल! हे बघा! सगळे तिचेच फोटो दिसताहेत! तुम्ही पण लिहा ना?” मी माघारी वळलो आणि तिच्याकडे पहात म्हणालो, “बाळा! स्फोटात उडालेली शब्दांची दगडे आज माझ्याच डोक्यावर येऊन धडाधडा आपटताहेत! माझ्याकडे शब्द नाहीत. काय लिहणार मी तुझ्यासारख्याच निरागस आसिफावर....!


photo credit:newscode



Wednesday, April 11, 2018

एका प्रेमाची गोष्ट

तर गर्दीतल्या मल्टीप्लेक्स मध्ये त्याचा हात हातात धरून ती आत गेली तेव्हा मुव्ही सुरु होऊन सगळीकडे अंधार पसरला होता. त्याच्या हाताचा आधार घेत हळूवार पाऊले टाकत ती मागच्या बाजूला बुकिंग केलेल्या सीटवर जाऊन बसली. काही वेळ गेल्यावर त्याच्या खांद्यावर मान टेकवत ती हळूच म्हणाली,
“खरं तर माझी खूपच घुसमट होत होती रे! आज खूप बरं वाटतय!”
“तुला मुव्ही आवडतो ना! म्हणून घेऊन आलोय!”
“मुव्हीपेक्षा तू सोबत असलास ना! सारं जग जवळ असल्याचा भास होतो बघ!
“अगं किती प्रेम करतेस माझ्यावर! इतका जीव लावणे काही बरे नाही!”
“काय करणार रे! अशीच आहे मी! वेडी आहे ना मी!”
“तू पण ना? खरच! वेडीच आहेस तू!”
“एक खरं सांगशील?
“बोल ना! मी काहीच नाही लपवित तुझ्यापासून!” म्हणत त्याने तिच्या खांद्यावर हात टाकला.
“तुझ्या आयुष्यात दुसरी कोणी तर नाही ना?”
“तुला काय वाटतं?”
“माझा विश्वास आहे रे तुझ्यावर! पण सांग ना असच?”
“एक मुलगी आहे अजून!”
“ये गप्प रे! मला खूप भीती वाटते! नाव सांग बरं तिचं!” त्याला घट्ट बिलगत ती म्हणाली.
“फक्त तूच आहेस!” तिचा हात दाबत तो म्हणाला.
“ऎक ना?”
“बोल!”
“आपल्या मागे जी बाई बसलीय ना! मघापासून ती माझ्या पायांना धक्के देतेय!”
“अरे चुकून लागत असेल! तू नको लक्ष्य देऊस!”
“बघ ना खाली वाकून! आतासुद्धा तिचा पाय माझ्या पायावर आहे!”
“अगं तिलाही तुझ्यासारखं कोणीतरी मिठीत घ्यावं असं वाटत असेल! भुकेली असेल बिचारी!”
“काहीही हं!”
“तुला नको असेल तर माझ्या पायांना धक्का द्यायला सांग तिला!”
“गप्प रे! नालायक कुठला!”
“इंटरव्हल कधी होणार गं!”
“होईल ना! तुला कसली एवढी घाई! कितीतरी दिवसांनी असा एकांत मिळालाय!”
“आता येत जाईन मी! प्रत्येक फ्राईडेला तुझ्यासोबत!”
“ए प्लीज! सांग ना तिला? पायांना चप्पलचे धक्के देतीय खालून!”
“अगं तू बोल ना तिच्याशी! मी कसं सांगणार तिला?
“अरे हि बाई मघाशी आपण बाहेर कोल्ड्रिंक्स पिताना सारखी पहात होती दोघांकडे?”
“हो का?” म्हणत त्याने मागे वळून पाहिले. आणि क्षणात तिचा हात हातातून सोडवत घामजलेला चेहरा पुढे करून शांत बसला.
“का रे! ओळखीची आहे हि ती?”

... इतक्यात मागून त्या बाईचा आवाज आला, “सटवेsss! त्याची बायको आहे मी! पाळतीवर आहे दोघांच्या! चालुद्या अजून तुमचं...!

#ज्ञानदेवपोळ

Photo:scoopwhoop

दमयंती

एका सकाळी पेपरची पाने चाळताना मधल्या पानावर एक छोटीशी बातमी दिसली, "विष पिऊन तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न." एकदम हादरलोच. आता तुम्ही म्हणाल यात नवल वाटण्यासारखं काहीच नाही. मरण स्वस्त झालेल्या देशात अशा बातम्यांनी रोज वर्तमानपत्रांची कितीतरी पाने काठोकाठ भरलेली असतात. पण मी मात्र तीच बातमी पुन्हा पुन्हा वाचू लागलो. हवं तर तुम्ही मला वेडा माणूस म्हणा. नाहीतर आणखी काहीही म्हणा. पण त्या तरुणीच्या नावाजवळच मी पुन्हा पुन्हा फिरू लागलो. गावाचं नाव वाचू लागलो. गावही तेच होतं. पळसगाव. झर्रकण मेंदूच्या पोटात शिरून तळात गेलो. त्यातील त्या व्यक्तीला शोधू लागलो. अखेर एका कोपऱ्यात पोहचल्यावर माझा शोध थांबला. तळात सापडलेली आणि पेपरमध्ये उमटलेली ती व्यक्ती होती, "दमयंती उमाजीराव जहागीदार". पहिल्यांदा आयुष्यात कधी भेटली? नेमकी केव्हा भेटली? कि मीच तिला भेटलो? यातलं मला काहीच आठवत नाही. पण माझ्या सबंध बालपणाच्या आयुष्यावर तिच्या आठवणींचं पांढरं फिकट धुकं पांघरलेलं आहे हे मात्र खरं आहे. मी पुन्हा तिच्या आठवणींच्या धुक्यात हरवलो. 

पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....

Photo: thealternative.
#ज्ञानदेवपोळ

Tuesday, March 27, 2018

दोन जगे

दिवस उगवायला नाना परळ एस.टी तून गावाबाहेरच्या फाट्यावर उतरले अन गठुळं घेऊन चालू लागले. फाट्यापासून मैलभर चालत गेलं की डोंगराच्या उताराला हजारभर लोकवस्तीची आपली सुळेवाडी येणार या आनंदात ते झपा झपा पावले टाकत चालू लागले. मुरुमाड रस्ता असल्यानं पायाला ठेचा लागत होत्या. विचाराच्या तंद्रीत वाडीबाहेरचा ओढा ओलांडून नाना गावात शिरले. गल्लीबोळातून सकाळी माणसांची कामधंद्यासाठी लगभग चाललेली. दुधाची गाडी गावतलं दुध गोळा करून गावाबाहेर पडत होती. नानाच्या डोक्यावरचं गठुळं बघून येणा जाणारा एखादा विचारायचा, "नाना लेकाकडून एवढं मोठं कशाचं गठुळं घेऊन आलासा. नाना खोटंच कायतरी सांगून वेळ मारत होते. अखेर नाना घराजवळ आले. नानाची बायको फुलाबाई बाहेरच्या चुलवाणावर पाण्याची तवली ठेवून जाळ लावत बसली होती. सगळ्या अंगणात धूर पसरला होता. आत थोरली सून स्वयंपाकाला लागली होती. नानानी खांद्यावरचं गठुळं सोफ्याला खाली ठेवलं आणि भिंतीला टेकून बसले. मागोमाग फुलाबाई जवळ आली आणि खाली बसत म्हणाली, 

पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....
#ज्ञानदेवपोळ
Photo Credit: AdarshGramGramodyog

Sunday, March 18, 2018

एका व्हीलचेअरचा प्रवास...

जगावर दुसऱ्या महायुद्धाचे ढग गळत असताना फ्रेंक आणि इझाबेल या मध्यम वर्गीय उच्च शिक्षित आई वडिलांच्या पोटी एक चुणचुणीत पोरगा जन्माला आला त्याचं नाव होतं स्टीफन हॉकिंग. या स्टीफनच्या जन्माची तारीख होती ८ जानेवारी १९४२. त्यांची घरची आर्थिक परिस्थिती बेतातीच होती. गणित आणि विज्ञानाच्या प्रतिभेने जन्मताच काठोकाठ भरलेल्या या मुलाला लहान पणापासूनच संगीत आणि वाचनाची विशेष आवड होती. गणित आणि भौतिकशास्त्र तर त्यांच्या आवडीचे विषय होते. शाळेत असताना स्टीफनला ‘आइनस्टाइन’ या टोपन नावानं ओळखलं जाऊ लागलं. त्यांनी लहानपणी शाळेत आपल्या मित्रांच्या मदतीने टाकाऊ वस्तूंचा वापर करून कॉम्प्युटर तयार केला होता. लंडनच्या सेंन्ट अल्बान्स या शाळेतील शिक्षणानंतर ब्रिटन मधील ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांने पदवी संपादन केली. पुढे उच्च शिक्षणासाठी हा तरुण केंब्रिज विद्यापीठाच्या दारापर्यंत दाखल झाला.

वाढणाऱ्या वयासोबत स्टीफन एकवीस वर्षाचा झाला. सर्व काही सुरळीत चालू असताना एका सुट्टीच्या दिवशी स्टीफन आपल्या घरी परतला. एका रिकाम्या वेळेत तो शिडीवरून उतरत असताना घसरला आणि तेथेच बेहोष झाला. तेथूनच स्टीफन हॉकिंग या नावाचा झंझावात सुरु झाला. अनेक डॉक्टरांना दाखवूनही त्याच्या आजाराचे निदान काही लवकर झालेच नाही. त्याचा एकविसावा वाढदिवस सुरु असतानाच नियतीने त्याला एका दुर्मिळ नव्या आजाराचे गिफ्ट कायमस्वरूपी बहाल केले. त्या दुर्मिळ गिफ्ट दिलेल्या आजाराचे नाव होते “मोटर न्यूरॉन डिसीज.” याच आजाराने अफाट बुद्धिमता लाभलेला इंग्लड मधला हा तरूण कायमस्वरूपी अंथरुणाला लपेटून बसला. आता जगण्याला अर्थच उरला नव्हता. प्रचंड निराशेत स्टीफन दिवस ढकलू लागला. त्याच्याच शेजारी असंख्य आजारांनी ग्रासलेल्या एका रोग्याची जगण्यासाठी अखंड चाललेली धरपड पाहून त्याला जीवनाविषयी, या जगाविषयी पुन्हा आशेचे किरण दिसू लागले. डॉक्टरांनी सांगितल्या नुसार दोन वर्षात आता आपला मरण आता अटळ आहे हे माहित असून हि या तरुणाने जगण्याची उमेद सोडली नाही. काही कालावधीच हा तरुण जगाचा निरोप घेणार हे माहित असतानाही त्याच्या जेन वाईल्ड नावाच्या प्रेयसीने त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. स्टीफन विवाहबद्ध झाले. आता जेन नावाची जादू तर त्यांच्या जगण्याचा नवा आधार बनली.

व्हीलचेअरचा आधार घेत स्टीफन नंतर केंब्रिज विद्यापीठात प्रोफेसर बनले. त्या तरुणाचे रुपांतर आता एका प्रोफेसरमध्ये झाले होते. अंथरुणाला चिकलेला आणि प्रचंड विज्ञानाने भरलेल्या मेंदूचा हा माणूस नव्या जगण्यासाठी जागेवरून उठून व्हील चेअरचा आधार घेऊन जगू लागला. नव्हे नुकताच जगला नाही तर त्या काळात त्यांची वैज्ञानिक म्हणून साऱ्या जगात कीर्ती पसरली. गणित, विज्ञान, भौतिकशास्त्रात त्यांनी अनेक संशोधने केली. विश्वाच्या निर्मितीचे रहस्य उलगडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आण्विक शक्ती, आणि सतत होणाऱ्या पृथ्वीवरच्या रासायनिक हल्ल्यांमुळे एक दिवस पृथ्वीचा विनाश अटळ असेल इथपर्यंत त्यांचे संशोधन पोहचले.

याच काळात हळू हळू शरीर त्यांची साथ सोडू लागले. अशा परिस्थितीत वेळोवेळी त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया होत गेल्या. श्वास नलिकेला छिद्र पाडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. त्यांना गिळताना प्रचंड त्रास होऊ लागला. अखेर एक दिवस नियतीने डाव टाकून त्यांचा आवाजही त्यांच्यापासून हिरावून नेला. या आजाराने त्यांच्या शरीरिक हालचाली बंद पडल्या. एका हाताच्या बोटांची काहीशी हालचाल करता होत असे. त्या बोटांचा वापर करून ते संगणकावर काम करत असत. संगणतज्ज्ञ डेव्हिड मेसन या त्यांच्या मित्राने त्यांच्या व्हील चेअरलाच एक संगणक जोडला. त्यांच्या संगणकासाठी एक नवी आज्ञावली लिहून कार्यरत करण्यात आली. याच तंत्रज्ञानाच्या आणि संगणकाच्या आवाजाच्या माध्यमातून स्टीफन यांना गळ्यातून बोलणे शक्य झाले. व्हाईस सिंथेसायझरच्या माध्यमातून ते पुढे बोलत राहिले. गंमत म्हणजे स्टीफन ब्रिटीश असूनही त्यांच्या सिंथेसायझरमधील त्यांचा आवाज हा पूर्णपणे अमेरिकन धाटणीचा होता. 

व्हीलचेअर समोरच्या बसवलेल्या याच माईकच्या ऐतिहासिक जागेवरून पुढे त्यांच्या जगण्याचे आणि संशोधनाचे शेकडो नवे अध्याय जगाने आजपर्यंत पाहिले. अनुभवले. लुळे पडलेले शरीर अंगावर घेऊन आणि मेंदूत असलेला ‘एकशे साठ आय.कू’ चा वापर करून स्टीफन यांनी काय नाही केले. त्यांनी अनेक नवे शोध लावले. बिग बॅंग थेअरीचा सिद्धांत त्यांनी मांडला. क्वांटम मेकॅनिक्स आणि सापेक्षतावाद एकाच सिद्धांतामध्ये मांडण्याचा पर्यंत केला. सैद्धांतीक भौतिकशास्त्रात त्यांनी जगाला मोलाचे योगदान दिले. विश्वाच्या निर्मिती पासून ते आकाशातील कृष्णविवरे कशी तयार होत असतील इत्यादी अनेक गोष्टींचा त्यांनी शोध घेतला. मानवाला न उकलणाऱ्या ब्रह्मांडातल्या गूढ रहस्यांचाही शोध घेण्याचा आणि चिंतनाचा त्यांनी आयुष्यभर ध्यासच घेतला होता. ब्रह्मांडाच्या उत्पतीबाबतचे त्यांचे शोध आणि विचार बऱ्याचशास्त्रज्ञानी स्वीकारलेले आहेत. 

अंतरिक्ष आणि पदार्थ विज्ञानाच्या क्षेत्रात तर त्यांनी वैश्विक मान्यताच मिळवली. जगातील पहिल्या दहा सर्वोत्तम वैज्ञानिकांमध्येही त्यांची गणना होत होती. 1988 साली “ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम” या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या जगभरात लाखो आवृत्या रातोरात खपल्या. यामध्ये त्यांनी बिग बँग आणि कृष्णविवरासंदर्भात सविस्तर विवेचन केले होते. तर दुसरीकडे या पुस्तकातून त्यांनी ईश्वराचं अस्तित्वच नाकारल्याने त्यांच्यावर त्या काळी प्रचंड टीकाही झाली. “लाईफ इन द युनिव्हर्स” या पुस्तकात परग्रहावरचे एलियन आणि मानव यांची भविष्यात भेट होईल असेही भाकीत केले आहे. त्यांनी विज्ञानाविषयीची जशी अनेक पुस्तके लिहिली तशीच त्यांनी लहान मुलांसाठीही पुस्तके लिहली. विशेषता ‘जॉर्जस सिक्रेट की टू युनिव्हर्स' , 'जॉर्जस कॉस्मिक ट्रेझर हंट' ही या त्यांच्या पुस्तकातील लेखन लोकप्रिय ठरले.

स्टीफन यांच्या वैवाहिक आयुष्यातील अनेक दु:खद प्रंसग जगाने आजपर्यंत अनुभवले. १९९५ मध्ये त्यांच्या जगण्याचा आधार असलेली जेन वाईल्ड या त्यांच्या पत्नीने त्यांच्यापासून कायमची फारकत घेतली. स्टीफन आणि जेन यांचा दोन तपाहून जास्त चाललेला संसार मोडला. नंतर इलियाना मेसन स्टीफन त्यांच्या आयुष्यात आली. पण २००६ च्या आसपास ती हि त्यांना सोडून गेली. पण स्टीफन जगत राहिले. नंतर तर ते नासाच्या स्टेशन मधून उंचही उडाले. २००७ मध्ये त्यांनी शून्य गुरूत्त्वाकर्षण शक्तीचा अनुभव घेतला. जवळ जवळ चार तपाहून अधिक काळानी ते प्रथमच व्हिलचेअरवरून उठून हवेत तरंगण्याचा अनुभव घेत होते.

2011 मध्ये 'गार्डियन'ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते, “गेली पन्नास वर्षे रोज मृत्यूच्या छायेत असूनही मी अजून जिद्दीने जगतो आहे. मी कधीही मृत्यूला घाबरत नाही. आणि मला अजून मरणाची घाईही नाही. कारण या जगातून निघून जाण्यापूर्वी मला अनेक कामं करायची आहेत”. म्हणूनच व्हीलचेअरच्या एका जागेवर आयुष्यभर ज्ञान विज्ञानाचा ध्यास घेऊन बसून राहिलेली त्यांची जिवंत मूर्ती ही जगात कौतुकाचा विषय ठरली.

आजारानंतर दोन वर्षापर्यंतच आयुष्य लाभलेला असा हा न्यूटन चा वारसदार अखेर ‘मोटर न्यूरॉन डिसीज’ नामक आजाराची ‘मेलेली लाश’ अंगावर घेऊन पुढे पन्नास वर्षे जगला आणि अखेरीस नियतीच्या यानातून हा झंजावात पृथ्वीच्या कक्षेबाहेर कायमचा निघून गेला...

#ज्ञानदेवपोळ


Wednesday, March 14, 2018

उंच उडालेले 'पतंग' राव

बाळंतपणात सून मेली आणि जन्माला आलेल्या नातवाला म्हातारीनं स्वताच्या थानाला लावलं. पोरगं नुसतच थानं वडायचं. पण दूध काय याचं नाय. घरात प्रचंड दारिद्य. दूध विकत घेऊन पाजायला पैसे नाहीत. अशा परिस्थितीत त्या म्हातारीने दुसऱ्याच्या बांधला हाडं घासून नातू मोठा केला. ग्रॅज्युयटपर्यंत शिकवला. घरात खायापियाचे वांदे. आता नातवाला कुठेतरी नोकरी मिळेल आणि घराला चांगले दिवस येतील या आशेवर म्हातारीनं इथपर्यंत रोजगार करून कसंतरी रेटलं. पण जगाच्या बाजारात नातवाला नोकरी देणार कोण? नातवानं नोकरीसाठी हजार उंबरे झिजवले. पण काही उपयोग झाला नाही. मग एका बाजारी म्हातारीने घरातली पितळेची भांडी नेऊन मोडली. आलेल्या पैशातून पुण्याला जायचा तिने निर्णय घेतला.

खेडेगाव सोडून उभ्या आयुष्यात शहर कधीच न पाहिलेली म्हातारी सांगली जिल्ह्यातल्या एका खेडेगावातून नातवाला घेऊन स्वारगेटला दिवस मावळायला उतरली. हातात एक कापडी पिशवी. त्यात वाळलेल्या भाकरी आणि चटणीची भुकटी. ती ज्या व्यक्तीला भेटायला आली होती त्या व्यक्तीच्या घराचा पत्ता विचारत विचारत सदाशिव पेठेतून पुढे लकडी पूल ओलांडून म्हातारी नातवासोबत डेक्कन कॉर्नरला आली. पण कोण म्हणायचं ती व्यक्ती कात्रजला राहती तर कोण म्हणायचं याच परिसरात राहती.

रात्रीच्या अकरा वाजता म्हातारी बी.एम.सी.सी कॉलेजच्या समोर एका छोट्याशा एकमजली बंगल्यासमोर पोहचली. रात्र झाल्याने बंगल्यात सामसूम. गेटवर असलेल्या वॉचमेनला म्हातारीनं हात जोडलं आणि म्हणाली,"लई लांबचा प्रवास करून आलीय बाबा! तेवढी सायबाची भेट घालून दे!तुज्या पाया पडती!" पण तुम्हाला आता भेटता येणार नाही. साहेब कधीच झोपलेत. तुम्ही सकाळी साहेबांच्या ऑफिसला जाऊन भेटा. असं त्या वॉचमेननं सांगितलं. पण काही झालं तरी येथून हलायचं नाही असं ठरवून आलेली म्हातारी तिथंच रस्त्याच्या कडेला नातवाला घेऊन बसून राहिली.

मध्यरात्री दोनची वेळ. सारं पुणे गाढ झोपेत गेलेलं. रस्त्याच्या कडेला अंधारात नातवासोबत डोळे लुकलुकत बसलेली म्हातारी. अशातच बंगल्यातील ती व्यक्ती जागी झाली. खिडकीतील नजरेने रस्त्यावर वडाच्या झाडाखाली बसलेली गावाकडची म्हातारी त्या नजरांनी बरोबर टिपली. एका क्षणात त्या बंगल्याच्या लाईटा पेटल्या. रात्रीच्या दोन वाजता त्या व्यक्तीने बंगल्याच्या खिडकीतून त्या म्हातारीला हाळी मारली. आणि पेंगाळून गेलेली म्हातारी क्षणात जागी झाली. अंगात गावाकडची बंडी आणि पट्ट्या पट्ट्याची साधी विजार घातलेली ती व्यक्ती खाली आली. मध्यरात्री वॉचमेनला चार शिव्या टाकून त्या म्हातारीला त्या व्यक्तीने स्वतः रस्त्यावर येऊन घरात नेली. ज्या व्यक्तीने त्या म्हातारीला घरात घेतली त्या व्यक्तीचं नाव होतं डॉ.पतंगराव कदम...

प्रचंड दारिद्र्यात आणि दुष्काळी पट्ट्यातल्या मातीत जन्माला येऊन आपल्या खेडवळ मातीतल्या माणसांना ओळखणारी ती व्यक्ती पतंगराव कदम होती. रात्रीच्या अडीच वाजता फुलागत जपलेल्या त्या म्हातारीच्या नातवाला त्याच्या राहण्या खाण्यासहित, स्वतःच्या शिक्षण संस्थेत फुकट नोकरी देणारा नेता या आधीही कधी महाराष्ट्रात जन्माला आला नाही आणि पुढेही येणार नाही. अशा हजारो नाही तर लाखो गरीब कुटुंबाना भाकरी मिळवून देणारा राजकारण आणि समाजकारणातला हा भक्कम वृक्ष आता कायमचा उन्मळून पडलाय....
शेवटी वृक्ष कोसळल्यावरच कळतं की तो किती उंच गेला होता...

इहलोकीचा प्रवास

...आंब्याच्या झाडाखाली सावलीत उरलेल्या आयुष्यावर शांत विचार करीत बसलेल्या त्याच्या निर्विकार चेहऱ्याकडे पहात ती म्हणाली.
"एक विचारू…?"
"हो विचार ना."
"मलाही तुझ्यासोबत शेवटच्या प्रवासाला यायचंय...नेशील?"
"हे बघ! क्षणभंगुर जीवन आहे माझं. तू सुखात रहा! आई होण्याचं भाग्य दिसतय तुझं या घरात?"
“राहिला असतास सोबत तर बरं झालं असतं!”
तो धडपडत हलला आणि तिच्या कपाळावर आपले ओठ अलगद टेकवत म्हणाला,
“मलाही तुझ्या सोबत जगायला आवडलं असतं! पण जन्म मृत्यू कुठे आहे आपल्या हातात?”
"तू दूर गेलास तरी तुझी आठवण कायम सोबत राहील." म्हणत ती ताडकन उठली.
"अगंss काय झालं? अशी एकदम का उठलीस! मी घाबरलो ना?"
"ते बघss… समोर पाहिलस का? बहुतेक तुझा इहलोकीचा अखेरचा प्रवास सुरु झालाय...”
हताश होऊन त्याने मान उंचावून समोर नजर टाकली. मालकासोबत उन्हात बोकड कापायचा चमकणारा धारदार सुरा हातात घेऊन उस्मान झपाझपा पाऊले टाकत त्याला कापण्यासाठी जवळ येत होता...”