Sunday, September 10, 2017

हिरवा चुडा

गावावर पसरलेल्या सावल्या लांब जाऊन एकमेकात जाऊन मिसळल्या. गुरं माणसं गावाकडं परतु लागली. दिवसभर भकास पडलेल्या गावाला जागेपणाची कळा आली. काही वेळात कडूसं मावळून गेलं. हलक्या पावलानं गावात अंधार शिरला. रस्त्यावर लागलेले दिवे वगळता नजरेच्या टप्प्यातलं दिसायचं बंद झालं. गावातल्या सगळ्या गाड्या परतल्या तरी बापलेक रानातून अजून गाडी घेऊन कशी काय आली नाहीत म्हणून भागवत अण्णाची चंद्रभागा ओसरीला येऊन रस्त्याकड नजर लावून बसली होती. तर चार दिवसापूर्वी ठरलेलं आपलं लग्न या महिन्यात होणार या आनंदात पंधरावी शकलेली सुगंधा चुलीपुढं भाकऱ्या थापत बसली होती. वैलावर आमटी रटरटत होती. मधीच आईबाप खर्चाचा मेळ कसा घालणार या काळजीनं ती तव्याकडं पचणाऱ्या भाकरीकड नुसतीच बघत होती. इतक्यात खाल्लीकडच्या गाडीरस्त्यानं बैलांच्या गळ्यातल्या घंटीचा आवाज होऊ लागला. घराच्या ओढीनं चवळ्या पवळ्या गाडी गोठ्याला घेऊन आले. सुभाषनं गाडी सोडली अन बैलं दावणीला बांधली. "इतका येळ का वं लागला आज! अण्णाच्या हातात पेंडीची घमेली देत चंद्रभागा म्हणाली. "अगं सगळा येडा काढला आज! फकस्त वरची ताल कुळवायची राहत व्हती म्हणलं पुन्हा बैलं मिळायची नाहीती! म्हणून उशीर लागला आज!"

पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....
फोटो सौजन्य: एस.आर फोटो कुस्ती मल्ल विद्या

No comments:

Post a Comment