गावावर सावलीसारखा अंधार पसरत निघाला होता. रानातनं गुरं ढोरं गावाकडं परतू लागली होती. देसायाची म्हातारी सारखी घरातनं आत बाहेर करीत होती. दोन तीन वेळा घरामागच्या रस्त्यावर येऊन डोकावून गेली. पोरगं मुंबईसनं येणार म्हणून आज तिचं कशातच चित्त नव्हतं. तसं सून मागच्या महिन्यात माहेरी गेल्यापासूनच तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं. सून परत नांदायला आली नाही तर डोळ्यादेखत पोराचा संसार मोडल या काळजीनं म्हातारी खंगू लागली होती. इतक्यात मामा आलाss मामा आलाss म्हणत दोनी पोरांनी तात्या मुंबईसनं आल्या आल्या आजोळच्या घरात नुसता गलका केला. चुलीपुढं भाकरी थापत बसलेली तात्याची बहिण लगबगीनं तसाच पिठाचा हात घेऊन उठली. धाकटं पोरगं देवापुढं माळेचे मनी मोजत बसलेल्या म्हातारी जवळ गेलं अन हलवून म्हणालं, “म्हातारे आये मामा आलं मुंबईसनं!” तात्या बसतोय न बसतोय तोच पोरानी हातातली बॅग ओढली. म्हातारी लेकीकडं बघून म्हणाली, “पोरंग कवा सकाळी निघालं असलं! दमला असल प्रवासानं! जेवणाचं बघ बया लवकर!” तोपर्यंत पोरांनी बॅग उघडली. एक एक करून चाळू लागली. अखेर तळातून एक मिठाईचा पुडा घेऊन सोफ्याला जाऊन खात बसली. बहिणीनं पाण्याचा तांब्या तात्याच्या हातात दिला. “तू कवा आलीस गं! हातात तांब्या घेत तात्या म्हणाला. “तू येणार म्हणून आम्ही दुपारीच आलोय! असं म्हणत ती गडबडीनं चुलिकडं वळली. तात्या तोंड धुवून मधल्या घरात येऊन बसला. म्हातारी येऊन जवळ बसली अन म्हणाली, सकाळी पहिल्या गाडीनं धामणगावला जावूया बघ! सुगीचं दिस हायती! सुंदरीचा सासू अन सासरा रानात जायच्या आत गाठलं पाहिजेल त्यास्नी!” तात्या बराच वेळ गप्प राहिला अन म्हणाला, “ उद्या काय ते साक्ष मोक्ष लावूनच येऊ!...
पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....
No comments:
Post a Comment